जळगाव प्रतिनिधी | शहरालगत असलेल्या सुप्रीम कॉलनीच्या मागील बाजूस डुब्बन नगरी परिसरात शुक्रवारी प्लास्टिकच्या कच्च्या मालाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत प्लास्टिकचे दाणे तसेच खुर्च्या, चपला आणि इतर प्लास्टिक वस्तू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील कच्चा माल जळून खाक झाला. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मोकळ्या मैदानात शेकडो टन प्लास्टिक कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता. या परिसरातील वीज वितरणाच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि त्यातून प्लास्टिकच्या साठ्याने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्लास्टिक ज्वलनशील असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पाच अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा करण्यात आला.
दरम्यान, आगीमुळे नेमके किती आर्थिक नुकसान झाले याचा अंदाज अद्याप आलेला नसून संबंधित यंत्रणांकडून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू आहे. परिसरात प्लास्टिक भंगार व कच्च्या मालाची अनेक गोदामे असल्याने आग अधिक पसरली असती तर मोठ्या प्रमाणात वित्तहानीसह जीवितहानी होण्याचीही शक्यता होती. मात्र अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.



