यावल प्रतिनिधी | व्हिडीओ कॉल करून आपण पोलिस अधिकारी असल्याचे भासवणे, भीती दाखवणे आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, कोणत्याही कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ अशी संकल्पना नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कॉल आल्यास घाबरून न जाता तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ टीना पाटील यांनी केले.
सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्या मंदिर शाळेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सायबर शिक्षा व सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात सायबर तज्ज्ञ टीना पाटील आणि दर्शना चौधरी यांनी ‘हॅकर मास्क’च्या माध्यमातून सायबर फसवणुकीचे प्रात्यक्षिक सादर केले. बनावट लिंक, आकर्षक संदेश, फोन कॉल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना कशाप्रकारे जाळ्यात ओढले जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
ओटीपी, यूपीआय फिशिंग, क्यूआर कोड, केवायसीच्या नावाने होणारी फसवणूक, फोटो मॉर्फिंग, बनावट सोशल मीडिया अकाउंट, पासवर्ड चोरी आणि ऑनलाइन व्यवहारातील फसवणूक याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
‘क्लिक करण्यापूर्वी विचार करा!’ असा संदेश देत अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले. तसेच कोणत्याही व्यक्तीस ओटीपी शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एस. भंगाळे होते. उपमुख्याध्यापक चंद्रकांत फिरके यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसेनजित बाविसकर यांनी केले.



